शनिवार, १६ ऑक्टोबर, २०१०

कलंदर

जगातील सगळीच माणस कशानतरी भारलेली असतात या भारलेपणातच काहीतरी विशेष असतं अन्यथा जीवन म्हणजे भकास वाळवंट होऊन जाईल. रितेपणाचं वा निवृतीचं जीवन जगण खूपच कठीण असतं. यामुळे कशात तरी मन गुंतवण आलचं! सगळी यशस्वी माणसं कोणत्या न कोणत्या तरी शक्तीने भारलेली होती. इतिहासात याच्या अनेक नोंदी सापडतील. त्यांची वाट साधी सोपी नव्हतीच, मात्र, त्यांनी अनेक अडचणींवर झुंजून मात केली आणि आमचा ठसा उमटविलेला दिसतो.
आजकालच जीवनच मुळी घड्याळ्याच्या काट्यावर धावणारे आहे. भारलेल्या दशेत अंगात नुसती झिंग चढलेली आहे. आपुलकी जिव्हाळा प्रेम, मायेचे चार शब्द ऐकणे दुरापास्त झालेले आहे. सगळीकडे कसा टापटीपपणाचा चकचकाट दिसून येतो. भावनेची जागा पैशाने घेतली. आणि संवेदना रापास्त झाली. हे विदारक सत्य निस्सीम आनंदापासून शेकडो मैल दूर पडले आहे.
खरा कलावंत कलंदर माणूस व्यवहारीपणाच्या बुरख्यात अधिक काळ जखडून राहू शकत नाही. निसर्गातील अनेक घटक त्याला साद घात असतात. त्या घटकांकडे तो विजेच्या चपळाईने धाव घेत असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणातील आनंद वा दुखः उपभोगण्यासाठी आसुरलेल असतं. गत आयुष्यातल्या बर्या वाईट गोष्टीत मन घुटमळत असते. प्रत्येकवेळी नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करते... निरपेक्ष भावनेने...!

"आयुष तेच आहे आणि हाच पेच आहे
तू भेटशी नव्याने बाकी सारे जुनेच आहे."

या कवितेत आंतरिक तळमळ व्यक्त करण्यात आली आहे. प्रवाहात अनेक माणसं भेटतात, हसतात, साथ-सोबत करतात. पुढे कालांतराने दुरावतात. आपली माणसं दूर गेल्याचं दुखः खूप मोठ असतं. पण., दुःखाची मैत्री करण्याचं सामर्थ्य कलंदरामध्ये नक्कीच असतं. पुढे कधीतरी ती माणसं पुन्हा भेटतात. जुन्या आठवणी ताज्या होतात. सार विश्व नव्यानं प्रगटत. पण, वेळ गेलेली असते. पुन्हा भरेल कि नाही याची शाश्वती नसते. आणि मनाशी प्रतारणा होणार नाही. याची भीती नेहमीच डोकावत असते यामुळे कलंदराला अनेक सुखांवर पाणी सोडावे लागते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा